

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील शिपाई पदाच्या ७९ जागांसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर पात्रतेबाबत अधिकृत माहिती पाठवण्यात आली असून, आता ३९५ उमेदवार पुढील टप्प्यातील मुलाखतीला सामोरे जाणार आहेत. दरम्यान, या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता केवळ १२ वी पास असतानाही पदवीधर, उच्च पदवीधर आणि अभियंत्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केल्याने सध्याची बेरोजगारीची भीषण स्थिती पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.
शिपाई पदाच्या ७९ जागांसाठी एकूण ४ हजार ४८९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३ हजार ७३३ उमेदवारांनी ६ सप्टेंबर रोजी झालेली लेखी परीक्षा दिली. सांगली शहरातील पाच आणि आष्टा येथील एका केंद्रावर ही परीक्षा पार पडली, तर ७५६ उमेदवार परीक्षेला अनुपस्थित राहिले. सुरुवातीच्या टप्प्यात अवघा १२ ते १४ हजार रुपये महिना पगार असतानाही शिपाई पदासाठी इच्छुकांची एवढी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, या भरतीत दोन-दोन पदव्या घेतलेले उच्चशिक्षित तरुणही नशीब अजमावत आहेत.
जिल्हा बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिपाई पदाच्या भरतीसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत अशी दुहेरी पद्धत अवलंबली जात आहे. आतापर्यंत बँकेतील रिक्त जागांच्या भरतीवर संबंधित तालुक्यातील संचालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मोठा प्रभाव राहत असे. परंतु, यावेळी प्रथमच जिल्हा बँकेने सर्व राजकीय व स्थानिक दबाव पूर्णपणे बाजूला ठेवून भरती प्रक्रियेसाठी एका स्वतंत्र आणि निष्पक्ष कंपनीची नियुक्ती केली असून, त्याद्वारे ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जात आहे.