

आटपाडी ः विभुतवाडी येथील हायस्कूलजवळ गुळेवाडी फाटा येथे बेकायदेशीर जमाव जमवून शेतकऱ्यावर चाकूने हल्ला केला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. राघु बबन माळवे (वय 38, रा. माळवे वस्ती, झरे, ता. आटपाडी) हे 27 एप्रिल रोजी रात्री सुमारे 8.30 वाजण्याच्या सुमारास विभुतवाडी हायस्कूलजवळील गुळेवाडी फाट्यावर थांबले असताना आरोपी तेथे आले. पूर्वीच्या वादातून त्यांनी शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.
यावेळी फिर्यादी व त्यांच्या सोबत असलेले साक्षीदार वाद सोडविण्यास गेले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. आरोपींपैकी निल पावणे याने चाकूने माळवे यांच्यावर वार करून त्यांना जखमी केले. तसेच इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर रात्री सुमारे 9.15 वाजण्याच्या सुमारास आरोपींपैकी एकाने फिर्यादीच्या घरासमोर जाऊन पुन्हा शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. बंदी आदेशाच्या कालावधीत ही घटना घडल्याने आरोपींवर त्याचाही भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.या प्रकरणी निल पावणे, अभिजित गुटुगडे (दोघे रा. गारुडी, ता. खटाव, जि. सातारा), निखिल चव्हाण, सूरज चव्हाण व प्रदीप हुंबे (रा. तरसवाडी, ता. खटाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.