

जत : मल्लाळ (ता. जत) येथे शेततलावाजवळ खेळत असताना पाय घसरून तलावात पडल्याने एका आठ वर्षांच्या चिमुकलीचा बुडून मृत्यू झाला. तिच्या लहान भावाला वाचविण्यात मात्र यश आले.
श्रावणी दीपक माने (वय 8) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव असून, तिचा लहान भाऊ आदित्य (वय 5) याला परिसरातील नागरिकांनी तत्काळ पाण्यातून बाहेर काढल्याने त्याला जीवनदान मिळाले. मंगळवारी (दि. 10) रोजी सायंकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
ही घटना मल्लाळ गावचे पोलिसपाटील शिवाजी सरगर यांनी जत पोलिस ठाण्यास दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झालेली नव्हती. ग्रामस्थांनी व पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दीपक माने हे शेतकरी आहेत. शेताच्या कामानिमित्त ते बाहेर गेले होते. आजी घराच्या अंगणात बसली होती. श्रावणी व आदित्य ही मुले घराशेजारीच असलेल्या शेततलावाजवळ खेळत होती. खेळताखेळता श्रावणी ही पाय घसरून शेततलावात पडली. तिला हात देताना आदित्यही पाण्यात पडला. त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारीच असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, आदित्य पाण्यावर तरंगत असताना दिसला. शेजारीच असणार्या एकाने पाण्यात उडी घेऊन त्याला पाण्याबाहेर काढले. त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र, श्रावणी हिला वाचविण्यास उशिरा झाल्याने तिचा या घटनेत मृत्यू झाला. श्रावणी ही नुकतीच पहिलीतून दुसरीच्या वर्गात गेली होती. या घटनेने मल्लाळ गावात हळहळ व्यक्त होत आहे. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास श्रावणीचा मृतदेह जत ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला या घटनेची उशिरापर्यंत जत पोलिस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.