

जालिंदर हुलवान
मिरज : मिरजेतील कंपन्यांतून दुबईसह आखाती देशांमधील फळ निर्यात बंद झाल्याने या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. शिवाय मिरज औद्योगिक वसाहतमध्ये गॅसचा पुरवठा कमी झाल्याने पुढील चार-पाच दिवसांमध्ये उद्योगांवर मोठा परिणाम दिसणार आहे.
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम सांगली जिल्ह्यातील फळ व्यवसायावरदेखील झाला आहे. मिरजेतील फ्रूट कंपनीकडून मोठ्या प्रमाणात द्राक्ष, डाळिंब, कलिंगड, केळी यासह अन्य प्रकारची फळे दुबई, ओमान, सौदी अरेबिया, बेहरीन, कतार यासह विविध आखाती देशांमध्ये पाठवली जातात. सांगलीसह विविध जिल्ह्यातून दर्जेदार फळांची निर्यात केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगले आर्थिक उत्पन्न मिळते. शिवाय या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र युद्ध सुरू झाल्याने यापूर्वी पाठवलेली फळेही त्या-त्या देशातील पोर्टमध्ये आणि मुंबईतील पोर्टजवळ पडून आहेत. तसेच काही कंटेनर हे परत आले आहेत.
मिरजेच्या फ्रुट कंपनीमध्ये सध्या फळे येणे बंद झाले आहेत. शिवाय पॅकिंगदेखील बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळांना चांगला दर मिळत होता, तो आता मिळणार नाही. त्यामुळे व्यावसायिक, या उद्योगावर अवलंबून असणारे कर्मचारी, शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.