आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : आटपाडी येथील शुक ओढ्या लागतच्या नांगरे कॉम्प्लेक्स मधील स्वराज्य कृषि केंद्रास शॉर्टसर्किटने गुरुवारी (दि. २७) रात्री आग लागली. या आगीत दुकानातील बियाणे, खते आणि औषधे यासह अन्य साहित्याचे ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची चर्चा आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की स्वराज्य कृषि केंद्राचे मालक शिवाजी शहाजी जाधव गुरुवारी रात्री दुकान बंद करून गेले. त्यानंतर रात्री किंवा पहाटेच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.या आगीत बियाणे, खते,औषधांची पोती आणि कपाट जळून खाक झाली.आगीच्या तांडवात सीसीटिव्ही यंत्रणा, दुकानातील टीव्ही आणि कॉम्प्युटर देखील जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
आज (दि. २७) सकाळी शिवाजी जाधव यांना दुकानातून धूर येत असल्याचे कोणीतरी फोनद्वारे सांगितले. जाधव आणि सहकाऱ्यांनी तातडीने धाव घेत दुकान उघडून आग विझवली.त्यानंतर काही बियाणांची आणि खतांची पोती बाहेर काढली. तोपर्यंत दुकानातील ८० टक्के साहित्य आगीत भस्मसात झाले होते.