

वसंत सावंत
जत : जत तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने पिण्याच्या पाण्यासह शेती आणि पशुधनासाठी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाची पावसाची स्थिती चिंताजनक असून, खरीप हंगाम धोक्यात आला आहे. तलाव, नाले, विहिरी आणि कूपनलिकांनी तळ गाठल्याने पिके वाचविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.
मे २०२६ मध्ये सरासरी २८.४० मि.मी.च्या तुलनेत ६५.१० टक्के पाऊस झाला. जूनमध्ये सरासरी ११३.७० मि.मी.च्या तुलनेत १२३.३० टक्के पाऊस झाला असला, तरी जुलै व ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिली. जुलैमध्ये सरासरी ५३.९० मि.मी.च्या तुलनेत ७६.९० टक्के, तर ऑगस्टमध्ये सरासरी १९.५० मि.मी.च्या तुलनेत केवळ २२.८० टक्के पाऊस झाला.
गतवर्षी जूनमध्ये ८५.७०, जुलैमध्ये ७४.१० आणि ऑगस्टमध्ये १६५.३० मि.मी. पाऊस झाल्याने विहिरी, कूपनलिका आणि तलावांत पुरेसा पाणीसाठा होता. त्यामुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची स्थिती समाधानकारक होती. यंदा ११ गावांत १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, आणखी आठ गावांचे टँकरसाठी प्रस्ताव प्रशासनाकडे आले आहेत. पाण्याअभावी खरीप पिके वाळत असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.