

मिरज : बैलगाडी शर्यतीनंतर झालेला वाद व किरकोळ मारहाणीतून पाटगावमधील खून झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अक्षय पांडुरंग माने (वय ३०, रा. योगेवाडी, ता. तासगाव), सर्वेश सूर्यकांत देशमुख (वय १९ आणि विक्की ऊर्फ धनराज मधुसूदन पवार (वय २३, दोघे रा. करोली एम, ता. मिरज) अशी त्यांची नावे आहेत, तर ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली पाटील (वय २७, रा. पाटगाव) याचा मृत्यू झाला होता.
ज्ञानेश्वर पाटील हा डोंगरवाडी येथे बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी संशयितही या ठिकाणी गेले होते. बैलगाडी शर्यत पाहून परतत असताना त्यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला होता. त्यातून मृताने त्यांना मारहाण देखील केली होती. याचा राग संशयितांच्या मनात होता. या रागातून संशयित हे ज्ञानेश्वर याच्या मागावर होते. दरम्यान, ज्ञानेश्वर हा शनिवारी रात्री पाटगाव फाट्यावरील शिवार हॉटेलजवळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याच्यावर कोयता आणि एडक्याने हल्ला करून त्यास ठार मारले होते. यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पलायन केले होते.
त्यांच्या मार्गावर सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मिरज ग्रामीण पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. तिघे संशयित त्याच परिसरात डोंगराजवळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. रविवारी तिघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस अधिक तपास करीत आहेत.