पलूस : सांगली जिल्ह्यात वाढत चाललेली नशेखोरी, त्यातून निर्माण होणारी गुंडगिरी, टोळीयुद्धे, खून व मारामारीच्या घटना अत्यंत चिंताजनक असून, गांजा, गुटखा आणि अन्य नशिले पदार्थ यांच्यावर कठोर नियंत्रण आणण्याची गरज आहे. जिल्ह्यातील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाणेनिहाय विशेष टास्क फोर्स स्थापन करावा, अशी मागणी आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केली.
ते म्हणाले, सांगली जिल्हा हा सहकार, संस्कृती आणि नाट्य परंपरेसाठी राज्यभर ओळखला जातो. सहकार पंढरी आणि नाट्यपंढरी, अशी ओळख असलेल्या या सुसंस्कृत जिल्ह्याची प्रतिमा गेल्या काही वर्षांत वाढत्या गुन्हेगारीमुळे मलीन होत चालली आहे. ते म्हणाले, जिल्ह्यात गुंडांच्या टोळ्या सक्रिय होत असून, टोळीयुद्धे, खून, मारामाऱ्या आणि दहशतीच्या घटना वाढताना दिसत आहेत. ही परिस्थिती सांगलीसारख्या शांत आणि सुसंस्कृत जिल्ह्यास अशोभनीय आहे.
आ. डॉ. कदम यांनी विशेषतः तरुण पिढीत वाढत असलेल्या नशेच्या व्यसनांबाबत चिंता व्यक्त केली. गांजा, मावा, गुटखा आणि अन्य नशिले पदार्थांच्या आहारी तरुण जात असून, त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. नशेखोरीमुळेच गुन्हेगारी प्रवृत्तीला खत-पाणी मिळत असून, गुंडगिरी आणि हिंसक घटनांमध्ये वाढ होत आहे, असे त्यांनी सांगितले.
वाढत्या गुन्हेगारीचा सर्वाधिक त्रास महिला, ज्येष्ठ नागरिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्याचे नमूद करत, जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.