

सांगली : मिरज पंचायत समितीच्या सभापती निवडीपूर्वी अपहरण करण्यात आलेले बुधगाव पंचायत समिती गणातील सदस्य पांडुरंग इंगळे यांनी पिस्तुलाच्या धाकाने चौघांनी आपले अपहरण केले. जीवे मारण्याची धमकी दिली. गोव्यातील कळंगुट बीचवर नेले.. असा जबाब पोलिसांना दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत अपहरण प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपविण्यात आला आहे.
मिरज पंचायत समितीच्या सभापती निवडीपूर्वी बुधगावचे सदस्य पांडुरंग इंगळे यांचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार त्यांचे पुत्र अमर इंगळे यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती. त्यामुळे ग्रामीण पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. मंगळवारी सभापती निवडीवेळी इंगळे गैरहजर राहिल्यामुळे नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यामुळे राजकीय पातळीवर या अपहरण प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. मंगळवारी सभापती निवडी झाल्यानंतर अपहरणकर्त्यांनी रात्री प्रथम मिरजेत आणून नंतर सांगलीत सोडल्याचे पांडुरंग इंगळे यांना सांगितले. त्यानंतर सांगली ग्रामीण पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात आणून जबाब नोंदवला.
इंगळे यांनी जबाबात म्हंटले आहे क, सभापती निवडीच्या आदल्या दिवशी दि. 9 रोजी बुधगाव-माधवनगर रस्त्यावरील शेतात गेलो होतो. सायंकाळी 5.30 वाजता एस्सार पेट्रोलपंपाजवळ मोटार घेऊन थांबलेल्या तिघांनी मला धरून मोटारीत जबरदस्तीने बसवले. त्यापैकी एकाने पिस्तूल रोखून खल्लास करण्याची धमकी दिली. मोबाईल काढून घेऊन बंद केला. तेथून मला नागज फाट्यावर नेले. वाटेत मोटारीतून नेताना मारहाण करण्यात आली. तेथे दुसरी मोटर (क्र. एमएच 10 ईए 7500) आल्यानंतर चौघांनी मला त्यामध्ये बसवले. रात्री 11.30 च्या सुमारास कर्नाटकमार्गे पहाटे अडीच वाजता गोव्यातील कळंगुट बीचजवळील एका लॉजवर नेले.
दि. 10 रोजी सकाळी नऊ वाजता तेथून परत गाडीत बसवले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास व्हनखंडे सरांच्या घराजवळ आणले. दोघे उतरून घरात गेले. काहीवेळाने परत आले. नंतर सांगलीत लक्ष्मी मंदिर चौकाजवळ रात्री साडे आठ वाजता सोडले. तेथून सांगली ग्रामीण पोलिसांनी मला पोलिस ठाण्यात आणले. अपहरण प्रकरणात समीर व्हनवाडे (रा. नरवाड), अजय कट्टीकर, गोटू गावडे, क्षीरसागर (सर्व रा. मालगाव) यांचा सहभाग आहे.