

सांगली :जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ सहायक आणि आरोग्य सेवक पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने तिघांना तब्बल 9 लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तिघांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जिल्हा परिषदेत आरोग्य विभागात भरतीच्या आमिषाने फसवणूकप्रकरणी अभिषेक शिवाजी देसाई याने गीता क्षीरसागर (रा. सांगलीवाडी), अविनाश आनंदराव जाधव (रा. माळवाडी) आणि नीरज क्षीरसागर (रा. सांगलीवाडी) या तिघांविरुद्ध तक्रार दिली आहे.
वरील तिघा संशतियांनी अभिषेक देसाई, नीतेश दिनकर शिंदे आणि भारत बाळासाहेब माने या तिघांना जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ सहायक आणि आरोग्य सेवक पदावर नोकरी लावतो, असे आश्वासन दिले होते. यासाठी अभिषेक देसाई याच्याकडून चार लाख रुपये, नीतेश शिंदे याच्याकडून अडीच लाख रुपये आणि भारत माने याच्याकडून अडीच लाख रुपये, असे 9 लाख रुपये संशयितांनी डिसेंबर 2023 ते मार्च 2025 यादरम्यान घेतले होते.
पण रक्कम देऊनही जिल्हा परिषदेमध्ये नोकरी न लागल्याने फसवणूक झालेल्या तिघांनी संशयितांकडे रक्कम परत मागितली. परंतु रक्कम परत देण्यास टाळाटाळ केल्याने तिघांविरुद्ध पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस अधिक तपास करीत आहेत.