

आटपाडी : येथील सराफ व्यावसायिकाची साडेचार ते पाच कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दागिने तयार करून आणण्याच्या बहाण्याने जवळपास ३ किलो ९८५ ग्रॅम वजनाचे २२ कॅरेट सोने घेऊन गेलेल्या सहाजणांवर गुन्हा दाखल आहे. याबाबत विकास विलास कदम (वय ४३, रा. कौठुळी, ता. आटपाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
कदम हे शेती व सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचे आटपाडी येथे ‘मेसर्स साहिल ज्वेलर्स ॲण्ड बुलियन’ नावाचे दुकान आहे. फिर्यादी कदम यांनी सोमनाथ अंबादास फाटे व बालाजी रामदास फाटे (रा. गार्डी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) यांना आपल्या दुकानात कामावर ठेवले होते. २९ मे २०२६ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास कोलकात्ता येथून दागिने तयार करून आणण्यासाठी कदम यांनी त्यांच्याकडे ३ किलो ९८५ ग्रॅम वजनाचे २२ कॅरेट सोने सुपूर्द केले होते. अंदाजे किंमत साडेचार ते पाच कोटी रुपये आहे.
या प्रवासासाठी संशयित प्रकाश भारत चव्हाण (रा. गार्डी, ता. पंढरपूर), बाळासाहेब नामदेव पुजारी (रा. सोनके, ता. पंढरपूर), शरद भीमराव पवार (रा. तिसंगी, ता. पंढरपूर) आणि अतुल गुलाबराव शिंदे (रा. पाटकुळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर) हेदेखील त्यांच्यासोबत गेले होते. मात्र, सर्व संशयितांनी संगनमत करून दागिने तयार करून आणले नाहीत, तसेच मूळ सोनेही परत न करता पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कदम यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. २४ जून रोजी गुन्हा दाखल केला आहे. सर्व संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना केली आहेत.