

जत शहर : तालुक्यातील बिळूर येथे जमिनीच्या वादातून एका महिलेसह तिच्या पतीवर दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इंदावती शिवाप्पा उल्लागडी (वय 35, रा. बिळूर) या 12 मार्च 2026 रोजी दुपारी 3:30 च्या सुमारास आपल्या शेतात चर काढण्याचे काम करत होत्या. यावेळी त्याच गावातील भीमाण्णा मल्लाप्पा शिलेदार, भौरव्वा भीमाण्णा शिलेदार, मल्लाप्पा भीमाण्णा शिलेदार व महादेव भीमाण्णा शिलेदार हे तेथे आले. ‘ही जमीन आमची आहे, येथे चर काढू नका’, असे म्हणत त्यांनी वादाला सुरुवात केली.
फिर्यादी इंदावती यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र संशयितांनी त्यांना मारहाण केली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेले फिर्यादीचे पती शिवाप्पा उल्लागडी व बहीण जयश्री यांनाही संशयितांनी मारहाण केली. दगडाने शिवाप्पा यांच्या डोक्यावर, छातीवर आणि पोटावर हल्ला करून त्यांना जखमी केले. या झटापटीत इंदावती व त्यांच्या बहिणीच्या कानातील सोन्याच्या रिंग हरवल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी जत पोलिसांनी चौघांविरुद्ध भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे.