

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४४४ कनिष्ठ लिपिक पदाच्या भरती परीक्षेसाठी आयबीपीएसने दिलेली दूरवरची परीक्षा केंद्रे बदलण्याच्या मागणीला अखेर यश आले आहे. बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक आणि संचालक मंडळाच्या तातडीच्या बैठकीतील आक्रमक भूमिकेनंतर ‘आयबीपीएस’ने पश्चिम महाराष्ट्रातच परीक्षा केंद्रे देण्यास अनुकूलता दर्शवली आहे. या निर्णयामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्हा बँकेत अनेक जागा रिक्त झाल्यामुळे भरतीची प्रक्रिया सुरू केलेली आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले असून सुमारे १९ हजारावर अर्ज आले आहेत. नाशिक, धुळे, जळगाव, नांदेड, अकोला यांसारख्या शेकडो किलोमीटर दूरच्या जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्रे आल्यामुळे १३ हजार उमेदवारांपैकी सुमारे १० हजार ५०० भूमिपुत्रांची मोठी अडचण झाली होती. विशेषत: ४० टक्के महिला उमेदवारांचा प्रवास आणि आर्थिक
भुर्दंड हा सुरक्षेचा आणि चिंतेचा विषय बनला होता.
याविरोधात बँकेच्या संचालक मंडळाने तातडीची बैठक घेऊन परीक्षा केंद्र बदलाचा ठराव आयबीपीएसकडे पाठवला होता. बँकेच्या या पाठपुराव्याची दखल घेत कंपनीने पश्चिम महाराष्ट्रातील केंद्रांवर परीक्षा घेण्याचे तत्त्वतः मान्य केले आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व कार्यकारी संचालक शिवाजीराव वाघ यांनी दिली.