

विटा : अडीच वर्षांपूर्वी राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत खानापूर मतदार संघातील पारे, ढवळेश्वर आणि आटपाडी तलावांना मंजूर झालेल्या साडेनऊ कोटी रुपये निधीचे काय झाले? असा प्रश्न आता लोक विचारत आहेत.
अडीच वर्षांपूर्वी म्हणजे अगदी नेमकेपणाने सांगायचं झालं तर, 28 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा परिषदेचे तत्कालीन माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान आमदार सुहास बाबर यांनी, महाराष्ट्र सरकारने राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत खानापूर मतदारसंघातील दरगोबा (पारे), ढवळेश्वर आणि आटपाडी या तीन तलावांची निवड केली असून, यासाठी एकूण 9 कोटी 44 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले होते. तसेच या मतदारसंघातील तलावांचे सुशोभीकरण होईल, त्यामुळे जिल्ह्याच्या एकूणच सौंदर्यात भर पडेल. शिवाय ते पर्यटनस्थळ म्हणून विकसित होतील, असे सांगितले होते. विशेष म्हणजे आमदार अनिल बाबर यांनी शासनदरबारी यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. याचाच परिणाम म्हणून राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत खानापूर मतदारसंघातील दरगोबा (पारे), ढवळेश्वर आणि आटपाडी या तीन तलावांना हा निधी मंजूर झाला होता. या निधीतून तलावांचे किनारा सौंदर्यीकरण, हरितपट्टा, संरक्षक भिंत, हायमास्ट पोल, मनोरंजनासाठी बालोद्यान, नौकाविहार व स्वच्छतागृहे आदी अशा पध्दतीने कामे करण्यात येणार होती. राज्य शासनाने राज्यातील तलाव, सरोवरे व मोठे जलाशय यांचे पर्यावरणीयदृष्ट्या संवर्धन करण्यासाठी सन 2006 - 07 वर्षापासून ही योजना सुरू केली. यात तलावाच्या पाण्याचे प्रदूषण करणारे स्त्रोत निश्चित करून प्रदूषण रोखणे, तलावात साचलेला घातक गाळ काढणे, तलावाची गुणवत्ता टिकवणे, जैविक प्रक्रियेद्वारे पाण्याची गुणवत्ता सुधारणे, यांसह किनारा सौंदर्यीकरण, हरितपट्टा विकसित करणे, कुंपण करणे, बालोद्यान, नौकाविहार व स्वच्छतागृहे आदी गोष्टी या निधीतून करण्यात येणार होत्या. आमदार अनिल बाबर यांनी राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निधी मिळावा म्हणून याबाबत प्रयत्न केले होते. त्यानुसार ढवळेश्वर तलावासाठी सुमारे 2 कोटी 88 लाख, तर पारे येथील दरगोबा तलावासाठी 3 कोटी 71 लाख आणि आटपाडी तलावासाठी सुमारे 2 कोटी 85 लाख रुपये निधी मंजूर झाला होता. मात्र प्रत्यक्षात यातील काहीएक काम झालेले नाही. असे असताना, मग मंजूर झालेल्या साडेनऊ कोटी रुपयांच्या निधीचे नेमके काय झाले? असे आता नागरिक विचारत आहेत.