

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून त्यांना समकक्ष ठरवण्याचा दुर्दैवी व आक्षेपार्ह प्रकार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. हेे केवळ ऐतिहासिक अज्ञानच नव्हे, तर महाराष्ट्राच्या अस्मितेवर थेट घाला आहे. अशा व्यक्तीला महाराष्ट्रात राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांच्या विधानाबद्दल केवळ माफी नव्हे, तर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करून बडतर्फ करावे, अशी मागणी करत काल भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्हाच्यावतीने काँग्रेस भवनसमोर आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस भवनसमोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. निषेधाच्या घोषणा दिल्या. भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. सरचिटणीस विश्वजित पाटील, नगरसेवक अतुल माने, मनोज सरगर, सुजित राऊत, योगिता राठोड, केदार खाडिलकर, सागर बिजरगी, राजू गवळी, श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते.