

सांगली : सांगलीवाडी येथील पतंगराव कदम कॉलेजसमोरील एका गाळ्यातून चोरट्यांनी संपूर्ण एटीएम मशीनच पळवून नेले. ही धक्कादायक घटना बुधवार, दि. १६ रोजी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी ११ लाख ८४ हजार ८०० रुपये रोख रकमेसह १ लाख ५० हजार रुपयांचे मशीन, असा एकूण १३ लाख ३४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घटनेमुळे परिसर आणि व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
याबाबत विकास विश्वनाथ आमनगी (वय ३५, रा. लोकमान्यनगर, कोरोची, इचलकरंजी) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगलीवाडी येथील जे. ई. पवार गाळा नंबर ०२ मध्ये ‘एनसीआर कॉर्पोरेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे एटीएम आहे. मंगळवार, १५ सप्टेंबरच्या सायंकाळी ५ च्या सुमारास ते बुधवार, १६ सप्टेंबरच्या सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यानच्या कालावधीत चोरट्याने गाळ्यात प्रवेश केला. एटीएम मशीनच्या केबल्स तोडल्या. १ लाख ५० हजार रुपये किमतीचे संपूर्ण एटीएम मशीनच मुळापासून उखडून पळवून नेले.
या मशीनमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचे ९ लाख ८४ हजार रुपये आणि १०० रुपयांच्या नोटांचे ५० हजार ८०० रुपये, अशी एकूण १० लाख ३४ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम होती. चोरी झालेली रोख रक्कम आणि मशीन असा एकूण ११ लाख ८४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला.
घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
सुरक्षा रक्षक आवश्यकच
ज्या गाळ्यात हे एटीएम बसवण्यात आले होते, तेथे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत हलगर्जीपणा असल्याचे समोर आले आहे. या एटीएम सेंटरवर कोणताही सुरक्षा रक्षक तैनात नव्हता. याच गोष्टीचा फायदा उठवत चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास हे कृत्य अत्यंत शिताफीने पार पाडले. शहरातील अनेक बँका आणि खासगी कंपन्यांच्या एटीएम केंद्रांवर सुरक्षा रक्षक नसतात, त्यामुळे अशा गुन्हेगारांचे धाडस वाढले असून पोलिस प्रशासनाने आता अशा असुरक्षित एटीएम केंद्रांवर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.