

जत शहर : जत शहरापासून सुमारे चार किलोमीटरवरील अमृतवाडी गावच्या हद्दीत एका शेतात 30 ते 35 वर्षीय अनोळखी महिलेचा खून झाल्याचे सोमवारी दुपारी उघड झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, जत-वळसंग रस्त्यावर एका पेट्रोल पंपाजवळ मुख्य रस्त्यापासून सुमारे अर्धा किलोमीटरवर आत निर्जन ठिकाणी शेतात काही शेतकऱ्यांना हा मृतदेह दिसला. त्यांनी जत पोलिसांना माहिती दिली. महिलेचे डोके दगडाने ठेचून तसेच तोंडावर ॲसिड टाकून तिचा खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
मृतदेह सडण्यास सुरुवात झाल्याने हा खून दोन दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे. मृतदेहाच्या गळ्यात मणी-मंगळसूत्र आणि हातात बांगड्या आहेत. घटनास्थळी लेडीज चप्पल, रक्ताचे डाग असलेला दगड, अन्नपदार्थ, शीतपेयाची बाटली आणि एक बॅग पोलिसांना सापडली आहे. बॅगमध्ये विशेष काही सापडले नसल्याची माहिती आहे. संबंधित महिलेने घटनास्थळी काही वेळ थांबून जेवण केल्यानंतरच हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. हा खून घटनास्थळीच झाला की अन्यत्र तिचा खून करून मृतदेह येथे आणून टाकला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळावरील काही नमुने गोळा केले आहेत. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.