

सांगली: गेल्यावर्षी जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मुख्य धरणांसह सर्वच प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र, पाटबंधारे विभाग व प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि पाण्याच्या अनिर्बंध वापरामुळे मान्सून लांबताच सांगली जिल्ह्यावर तीव्र पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेमुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची उभी पिके जळून खाक होण्याच्या मार्गावर आहेत.
गतवर्षी मान्सून आणि परतीच्या पावसाने धरणांचे जलाशय काठोकाठ भरले होते. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाही धरणांमध्ये पुरेशा प्रमाणात जिवंत साठा उपलब्ध होता. परंतु, उन्हाळ्याच्या तीव्रतेचा आणि पाऊस लांबणीवर पडण्याच्या संभाव्य धोक्याचा पाटबंधारे विभागाने कोणताही अंदाज घेतला नाही. हवामान विभागाने सुरुवातीलाच यंदा एल् निनोमुळे पाऊस कमी पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार नियोजन झाले नाही. रब्बी आणि उन्हाळी हंगामात पाण्याच्या उपशावर कोणतेही कडक नियंत्रण ठेवले नाही. परिणामी कालव्यांद्वारे पाण्याचे वाटप करताना मोठ्या प्रमाणावर अपव्यय झाला.
बंधाऱ्यांमधील पाण्याचे बाष्पीभवन, गळती
कृष्णा व वारणा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये वेळेत पाणी साठवून त्याचे सूक्ष्म नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, गळती दुरुस्तीकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याच्या अनधिकृत उपशाकडे डोळेझाक केल्यामुळे आज नदीपात्र कोरडे पडू लागले आहे.
शेती धोक्यात; पिके करपण्याच्या मार्गावर
जिल्ह्यातील वाळवा, पलूस, मिरज या भागात उसाचे क्षेत्र मोठे आहे, तर तासगाव, खानापूर आणि जत पट्ट्यात फळबागा मोठ्या प्रमाणावर आहेत. पाणीटंचाईमुळे या दोन्ही क्षेत्रांना मोठा फटका बसत आहे.गेल्यावर्षी जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मुख्य धरणांसह सर्वच प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र, पाटबंधारे विभाग व प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि पाण्याच्या अनिर्बंध वापरामुळे मान्सून लांबताच सांगली जिल्ह्यावर तीव्र पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेमुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची उभी पिके जळून खाक होण्याच्या मार्गावर आहेत.