

सांगली : नांद्रे-सांगली मार्गावर नावरसवाडीजवळ वडाप जीप उलटली. या अपघातात सहा ते सातजण जखमी झाले. वडाप चालकाच्या बाजूचा दरवाजा निघाल्याने नियंत्रण सुटून अपघात झाला. जखमींना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वडाप शेतात पलटी झाल्याने मोठी दुर्घटना टळली.
या अपघातात जास्मीन महंमदशरीफ अथणीकर (रा. मोमीन गल्ली, मिरज), नीशा अशरफ राजपूर (रा. निगडी, पुणे), सुषमा बाळू कांबळे (रा. बेंद्री शिरगाव, ता. तासगाव), हनिफा युनुस बागवान (रा. नांद्रे, ता. मिरज), संजय संतोष भोरे (रा. कर्जत, रायगड) हे जखमी झाले. याप्रकरणी वडापचालक तेजस मारुती लोखंडे (रा. वसंतदादा साखर कारखानाजवळ, माधवनगर) याच्यावर सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चालक तेजस लोखंडे हा वडाप जीप (एमएचके 0513) घेऊन नांद्रेहून सांगलीकडे येत होता. नावरसवाडी नवीन पुलाच्या पुढील वळणावर जीपच्या चालकाच्या बाजूचा दरवाजा निघाल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि वडाप जीप शेतात जाऊन पटली झाली. यावेळी वडापमधील 9 प्रवासी गंभीर, तर चारजण किरकोळ जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.