

जत : तालुक्यातील खैराव परिसरात गेल्या दिवसांपासून झालेल्या पावसामुळे कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. हजारो एकरांवरील पिके पाण्यात उभे राहिल्याने पूर्णपणे सडून गेली आहेत. खैराव गावात तब्बल 400 एकर क्षेत्रावरील कांदा कुजलेल्या अवस्थेत असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
या पावसामुळे खैराव येथील नुकसानग्रस्त शेतकर्यांमध्ये ललिता मनगेनी करांडे, सुनील क्षीरसागर, प्रकाश क्षीरसागर, उत्तम क्षीरसागर, संतोष निमंगरे, हिंदुराव येडवे, चांगदेव येडवे, श्रीमंत निळे, हुसेन मुलाणी, पाराप्पा निमंगरे, नामदेव करांडे, नवनाथ करांडे, नागेश करांडे, पांडुरंग सांगोलकर, केराप्पा येडवे, लायाप्पा जीपटे यांचा समावेश असून सर्वच शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
खैराव येथील शेतकरी मनगेनी केराप्पा करांडे यांनी सांगितले की, कर्ज काढून कांद्याची लागवड केली होती. आता सर्व पिके सडून गेल्याने संसार उद्ध्वस्त होणार आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून मदत करावी. सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचा हंगाम पूर्णपणे कोलमडला आहे. शेतकर्यांनी शासनाकडे तातडीने दिलासा देण्याची मागणी केली आहे.
पंचनामे सुरू : तहसीलदार प्रवीण धानोरकर
जत तालुक्यातील नुकसानग्रस्त बाधित क्षेत्राचे पंचनामे कृषी विभाग व महसूल विभागाच्या वतीने सुरू आहेत. फळबागा, घराची पडझड, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत. तरी संबंधित शेतकर्यांनी आपल्या नुकसानीबाबतची माहिती वस्तुनिष्ठ पद्धतीने द्यावी, असे आवाहन तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी केले आहे.