

वारणावती : सह्याद्री व्याघ्र राखीवच्या ढेबेवाडी वनपरिक्षेत्रात वाघांच्या खाद्यासाठी तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढवण्याच्या उद्देशाने पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय, कात्रज येथून चितळ व सांबर या वन्यप्राण्यांचे यशस्वी स्थलांतर करण्यात आले.
दि. 5 ते 7 एप्रिल या कालावधीत राजीव गांधी प्राणीसंग्रहालय, कात्रज पुणे येथून 17 नर व 13 मादी, असे एकूण 30 चितळ, तसेच 4 नर व 6 मादी, असे एकूण 10 सांबर सुरक्षितरीत्या पुणे ते झोळंबीपर्यंत वाहतूक करून सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात सोडण्यात आले.
सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील वाघांच्या खाद्यामध्ये तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढवण्याच्या अनुषंगाने भक्ष संवर्धन कार्यक्रम अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. या स्थलांतर मोहिमेसाठी रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, बावधन (पुणे) यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. ही संपूर्ण मोहीम क्षेत्र संचालक तुषार चव्हाण (सह्याद्री व्याघ्र राखीव, कोल्हापूर), उपसंचालक स्नेहलता पाटील (चांदोली वन्यजीव विभाग), सहायक वनसंरक्षक संदेश पाटील (ढेबेवाडी) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनपरिक्षेत्र अधिकारी किरण माने, वनपाल काशिलिंग बादरे, वनरक्षक बळवंत चक्रधर, वनरक्षक झोळंबी व वनसेवकांच्या पथकाने ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.