

आटपाडी : अपंगत्वावर मात करत पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या गोळाफेक F46 प्रकारात रौप्य पदक पटकावणाऱ्या सचिन सर्जेराव खिलारी या माणदेशी युवकाने अर्जुन पुरस्काराला गवसणी घातली आहे. क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सचिनच्या कामगिरीची दखल घेत आज (दि.२) सचिन खिलारी याला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. आटपाडी आणि सांगली जिल्ह्याचे नाव उंचावणाऱ्या सचिनचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सचिन हा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती, कृषि क्षेत्रात आपल्या कामाची मोहोर उठवणारे दिवंगत अॅड.सर्जेराव खिलारी यांचा चिरंजीव. तो अवघ्या ९ वर्षांचा असताना सायकल चालवताना पडल्याने त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला. यामुळे काही दिवसात गँगरीन पसरू लागले. या जीवघेण्या संकटातून ताे बचावला; पण त्याच्या हाताच्या हालचालींवर कायमस्वरुपी मर्यादा आल्या. बालपणातच हा मोठा अघात त्याने माेठ्या धैर्याने पचवला. लहानपणापासून खेळाची कमालीची आवड होतीच. पण आता आपल्या शारीरिक मर्यादेचे भांडवल न करता त्याने थेट माेठे मैदान गाजवण्याचा निर्धार केला. अथक परिश्रम आणि स्वप्नपूर्तीचा निरंतर ध्यासातून सचिन सर्जेराव खिलारी नावाचा खेळाडू घडला.
इंजिनीअर असलेल्या सचिनने आज पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या गोळाफेक F46 प्रकारात रौप्य पदक पटकावत देशवासियांची मान गर्वाने उंचावली आहे. त्याचबराेबर संकटाचे संधीमध्ये कसे रुपांतर करावे, याचा आदर्श देशातील तरुणाई समाेर ठेवला आहे. पुण्यात खिलारीने पहिल्यांदा आझम कॅम्पसमध्ये ॲथलेटिक्स ट्रॅक पाहिला. येथेच त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. अथलेटिक्समध्येच करिअर करण्याचा निश्चय त्याने केला. त्यानंतर प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली थाळीफेक व भालाफेक करण्यास सुरुवात केली.
सचिनने २०२३ च्या जागतिक पॅरा अजिंक्यपद स्पर्धेत गोळाफेकमधील F46 गटात १६.२१ मीटर थ्रो सह सुवर्णपदक पटकावले. २०२४ च्या जागतिक स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले. २०२२ मध्ये आशियाई पॅरा स्पर्धेतील सुवर्णपदकही त्याच्या नावावर आहे.
सचिन खिलारीने १६.३२ मीटर्सच्या आशियाई विक्रमी थ्रोसह दुसरे स्थान पटकावले. सचिनचे सुवर्णपदक अवघ्या ०.०६ मीटरने हुकले. सचिनने 2023 वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या शॉटपुट F46 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तसेच 2024 च्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदकावर मोहोर उमटवली होती. पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेक क्रीडा प्रकारात त्याच्या कामगिरीमुळे भारताने ४० वर्षांनंतर पदक जिंकले आहे.
यापूर्वी १९८४ मध्ये भारताने या क्रीडा प्रकारात पदक जिंकले होते. क्रीडाक्षेत्रातील सचिनच्या या दैदीप्यमान कामागिरीने त्याला 'अर्जुन' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सचिन खिलारीचा अर्जुन पुरस्कार अनेक युवकांना प्रेरणा देणारा ठरणार आहे. तालुक्यातून अर्जुन पुरस्कार मिळविणारा सचिन हा पहिलाच क्रीडापटू आहे.