

संदीप माने
ईश्वरपूर : जि. प. व पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाचे राजकीय पदाधिकारी, त्यांचे सगेसोयरे रिंगणात असल्याने वाळवा तालुक्यात निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राष्ट्रवादी (श. प.) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, रयत क्रांती पक्षाचे संस्थापक आ. सदाभाऊ खोत यांच्याबरोबरच शिवसेना (उबाठा), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.), राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांचे जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हे वाळवा तालुक्यातीलच असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
महायुतीतील घटकपक्षातील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, शिवसेनेचे संघटक गौरव नायकवडी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली बावची, वाळवा येथील दोन गटात व वाळवा, पडवळवाडी, बावची, गोटखिंडी गणात शिवसेनेचे उमेदवार दिले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा तेथे झाली होती. भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कासेगाव, वाटेगाव, पेठ, कामेरी, चिकुर्डे, येलूर येथील गटात त्याअंतर्गत येणाऱ्या 12 गणात उमेदवार होते. येलूर येथे सम्राट यांच्या भावजय हर्षदा महाडिक यांची उमेदवारी होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रेठरेहरणाक्ष गटात व दोन्ही गणात असे तिघे उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादीचे काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील हे आ. जयंत पाटील यांचे पुतणे आहेत. आ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व देवराज यांच्या नेतृत्वाखाली 10 गटात व सर्व 22 गणात राष्ट्रवादी (श. प.) उमेदवार रिंगणात होते. देवराज यांच्या आत्या संध्या पाटील (रेठरेधरण गट), पत्नी सुप्रिया पाटील (कासेगाव गण), बहीण संगीता पाटील (कासेगाव गट) यांनी तेथून निवडणूक लढवली आहे. रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत यांच्या पत्नी मोहिनी खोत यांनी बागणी गटातून निवडणूक लढवली आहे. तेथील दोन्ही गणात रयत क्रांती पक्षाचे उमेदवार उभे आहेत, तर बोरगाव गट त्याअंतर्गत येणारे दोन्ही गण महायुतीने काँग्रेससाठी सोडले होते. तेथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील या काँग्रेसकडून राष्ट्रवादी (श. प.) च्या विरोधात उभ्या होत्या. तेथील दोन्ही गणात राष्ट्रवादी (श. प.) शी सरळ सामना होता.