

इस्लामपूर : ‘संवादातून संघर्षाकडे’ हे रयत क्रांती संघटनेचे ब्रीदवाक्य आहे. न्याय मिळत नसेल तर संघर्ष हा करावाच लागेल. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीने योग्य जागा न दिल्यास रयत क्रांती संघटना स्वबळावर निवडणुका लढेल, असे प्रतिपादन रयत क्रांती संघटनेचे संस्थापक - अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी केले.
रेठरे धरण (ता. वाळवा) येथे माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांनी रयत क्रांती संघटनेत प्रवेश केला, यावेळी आ. खोत बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सागर खोत, जिल्हाध्यक्ष विनायक जाधव, लालासाहेब पाटील, सुदर्शन पाटील, तालुकाध्यक्ष शशिकांत शेळके, शंभुराजे माने उपस्थित होते.
भीमराव माने म्हणाले, रयत क्रांती संघटनेची धुरा आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. या माध्यमातून विविध प्रश्न हाती घेणार आहे. सदाभाऊ खोत हे स्वबळावर चळवळीच्या मुशीतून निर्माण झालेले नेतृत्व आहे. यावेळी लालासाहेब धुमाळ, प्रकाश कोळी, राकेश भोसले, चेतन चौगुले, डी. के. पाटील, प्रशांत पाटील, बजरंग भोसले, किरण उथळे, संदीप फार्णे, मोहसीन पटवेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.