

सांगली : येथील निकिता शिवराज मनगोळी यांच्या जळीत हत्याकांडास कारणीभूत असणाऱ्या व कट-कारस्थान करणाऱ्या लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी मांग गारुडी समाज युवक संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
याबाबत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये निकिता शिवराज मनगोळी यांच्या जळीत हत्याकांडास कारणीभूत असणाऱ्या नराधमास आणि कट-कारस्थान करणाऱ्या लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या हत्याकांडाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो अथवा सीआयडीमार्फत करण्यात यावा, याप्रकरणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधकअन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
आंदोलनामध्ये उत्तम कांबळे, भारत चौगुले, शिवाजी त्रिमुखे, चरण चौगुले, सतीश देंडे, दिगंबर सकट, समशेर चौगुले आदी सहभागी झाले होते.