

जत : आंबेडकरी चळवळ ही सोपी नाही. ती स्वतः पासून सुरू करावी लागेल, तरच इतर समाज तुमच्या पाठीमागे येईल. राजकीय लढ्यात आपल्याला काही साध्य होणार नाही. मात्र, सांस्कृतिक लढा हाच खरा जातिअंताचा लढा ठरेल. सर्व जाती-धर्मातील बहुजन वर्गास एकत्र करून ही लढाई लढावी लागेल, असे प्रतिपादन विद्रोही साहित्य चळवळीचे राज्य अध्यक्ष पार्थ पोळके यांनी केले.
जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात पोळके बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश शिंदे, बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, अॅड. प्रभाकर जाधव, युवराज निकम, अविनाश वाघमारे, भूपेंद्र कांबळे, अतुल कांबळे, आनंद कांबळे आदींसह आंबेडकरप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार विलासराव जगताप यांनी, ‘हिंदू राष्ट्र घडवायचं आहे, असं सांगता, मग संविधानाला हे मान्य आहे का?’, असा सवाल केला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी नूतन समाज मंदिर व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अद्ययावत अभ्यासिका केंद्रासाठी निधी देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. माजी आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. आ. पडळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली.