

नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथील गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतूक कोंडी आणि अपघातांचे केंद्र बनलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पूल अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कित्येक दिवसांपासून गजबजलेल्या येथील सेवा रस्त्यावर (सर्व्हिस रोड) आता पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या बदलामुळे स्थानिक ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला.
उड्डाण पुलाचे काम अपूर्ण असताना सर्व प्रकारची वाहतूक रस्त्यावरूनच सुरू होती. यामुळे परिसरात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले होते. स्थानिक नागरिकांना, शाळकरी मुलांना, वृद्धांना शेतकऱ्यांना रस्ता ओलांडणे कठीण झाले होते. आता उड्डाण पूल सुरू झाल्यामुळे हायवेवरून वेगाने जाणारी वाहने थेट पुलावरून जात आहेत. गावातील अंतर्गत वाहतूक आणि पादचाऱ्यांना आता कोणत्याही भीतीशिवाय सुरक्षितपणे ये-जा करणे सोपे झाले आहे. पूर्वी सेवारस्त्यावरून जाताना जीव मुठीत धरून चालावे लागायचे. सतत वाहनांचे हॉर्न आणि प्रदूषण यामुळे नागरिक त्रस्त होते. आता पूल सुरू झाल्याने सेवारस्ते मोकळे झाले असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.