विटा: सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा सपशेल पराभव झालेला आहे. जिल्ह्यातील दहापैकी सहा तालुक्यांत त्यांचा एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेला नाही. उद्या विधानसभेला, लोकसभेत सुद्धा लोक त्यांना नाकारतील. त्यामुळे भाजपने आता पराभवाची सवय लावून घ्यावी, असे वक्तव्य खासदार विशाल पाटील यांनी केले.
विट्यात आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानी खा. पाटील आले होते, तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार पाटील म्हणाले, सगळ्यात कमी भाजपचा स्ट्राईक रेट आहे. त्यांच्या फक्त 16 जागा निवडून आलेल्या आहेत. महापालिका निवडणुकीत सगळ्यात हायेस्ट स्ट्राईक रेट काँग्रेसचा राहिला होता. यावेळी आमचा प्रयत्न दोन नंबरचा राहिलेला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा आहे. जितक्या जागा लढवल्या त्यापैकी किती जागा जिंकल्या, यामध्ये स्ट्राईक रेट ठरतो. यामध्ये महाविकास आघाडीचे घटकपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोघे आघाडीवर आहेत. भाजप खूप मागे आहे. भाजपने एवढे पैसे खर्च करून बेसुमार सत्तेचा वापर करून, लोकांसमोर जाऊन, पालकमंत्र्यांनी 35 जागा आमच्या येतील असे सांगितले होते. त्यांच्या 20 जागा सुद्धा निवडून येऊ शकल्या नाहीत. आम्ही एकसंध लढत असतेो तर भाजपला एक सीट सुद्धा मिळाली नसती. आता एवढ्या पराभूत झालेल्या पक्षाला सत्तेत का घुसायचय?
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाबाबत ते म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते विश्वजित कदम हे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी बोलत आहेत. तसेच काही ठिकाणी आमच्यासोबत लढलेला शिवसेना एकनाथ शिंदे यांचा एक गट आहे, राष्ट्रवादी ज्या आता सुमित्रा पवार चालवतात त्यांचा एक गट आहे. अशी आमची एकूण मिळून 43 पर्यंत बेरीज जात आहे. त्यामुळे काय अडचण येईल असं वाटत नाही. महापालिकेत सुद्धा 39-39 झालं होतं. त्यावेळी आमच्यासोबत लढलेल्या राष्ट्रवादीला बरोबर घेत सत्ता स्थापन केली. तसं आता होईल असं वाटत नाही. येत्या 18 तारखेच्या निवडीपूर्वी 16-17 मार्चला हे सगळे नेते एकत्र बसून निर्णय होईल असे मला वाटते.

