

शिराळा शहर : राज्यातील शाळांना आर.टी.ई. अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिपूर्ती भत्त्यात वाढ करण्यात यावी, तसेच मोफत शिक्षणाची सध्याची मर्यादा इयत्ता आठवीवरून इयत्ता दहावीपर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी आमदार सत्यजित देशमुख यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली.
ते म्हणाले, आर.टी.ई. कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये 25 टक्के प्रवेश देण्यात येतो. मात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळांना शासनाकडून मिळणाऱ्या प्रतिपूर्ती भत्त्यात अनेक वर्षांपासून वाढ झालेली नाही. दुसरीकडे शाळांचे शिक्षण शुल्क, कर्मचारी वेतन, वीजदर, भाडे तसेच इतर शैक्षणिक खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे सध्याची प्रतिपूर्तीची रक्कम अपुरी पडत असून शाळा व विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.