

जालिंदर हुलवान
मिरज : राजकारणात सोय आणि गैरसोय यावरूनच सर्व काही ठरताना पाहावे लागते आहे. आपल्याबरोबर असेल तर तो सोयीचा आणि आपल्याबरोबर नसेल तर तो गैरसोयीचा. सोयीचा असेल त्याला तुपाशी, गैरसोयीचा असेल त्याला ठेवले जाते उपाशी. हा प्रकार समाजाच्या भविष्यासाठी मात्र अपायकारकच.
अनेक ठिकाणी विरोधी पक्षांतील लोकप्रतिनिधींची पदे रद्द होणे, पक्षांतर होणे, तसेच स्थानिक संस्थांमधील सत्तांतराच्या घटना सतत होत आहेत. ही मंडळी सत्ताकारणाशिवाय बाकीचे काम काही करतात की नाही, असा प्रश्न पडतो. विरोधी पक्षांची सर्व बाजूंनी गळचेपी केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार होतोय.
मिरज पंचायत समितीत भाजपने दाखवला प्रभाव
मिरज पंचायत समितीत काँग्रेसची सत्ता संपुष्टात येऊन भाजपची सत्ता स्थापन होण्याची प्रक्रिया सुरू आहे. वास्तविक मिरज पंचायतीत भाजपचे सर्वाधिक सदस्य असताना सत्ता मात्र काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना, अशी एकत्रित मिळून झाली. काँग्रेसच्या सभापती तन्वी कमलेकर आणि उपसभापती शिंदे शिवसेनेच्या ललिता शेजुळ बनल्या. सर्वाधिक सदस्य असताना अशी सत्ता भाजपला आवडेलच कशी? भाजपच्या सदस्यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. झाले, काँग्रेसची सत्ता जाऊन पुन्हा भाजपची सत्ता येईल, अशी स्थिती निर्माण करण्यात आली. यामुळे काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, तर भाजपने प्रभाव दाखवला.
भाजपचा मनपात दणका
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कोळी या नगरसेविकेचे पद रद्द झाले. त्याचे कवित्व सुरूच आहे. त्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडून आल्या होत्या. भाजपच्या सदस्यांनी त्यांचे पद घालवण्यासाठी मोठे प्रयत्न केले.