

कवठेमहांकाळ, पुढारी वृत्तसेवा : मिरज-पंढरपूर महामार्गावर रविवारी (दि.१३) रात्री झालेल्या भीषण अपघातात ४ मजूर महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. या अपघातात भारती राजू कांबळे (वय २५) आणि रेखा त्रिपाठी कांबळे (वय ४०, दोघीही रा. म्हैसाळ) या दोघींचा मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेल्या रूपा बाळकृष्ण माने (वय ३५, रा. म्हैसाळ) हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर जखमी कांचन पांडुरंग कांबळे (वय ५२) या महिलेचा आज (दि.१६) मृत्यू झाला. या घटनेमुळे म्हैसाळ गावात शोककळा पसरली आहे. (Sangli Accident News)
म्हैसाळ (ता. मिरज) येथील मजूर खर्डी (जि. सोलापूर) येथील द्राक्षबागेतून काम करून टेम्पोने परतत असताना कुची गावाजवळील एस. आर. हॉटेलसमोर ट्रकने टेम्पोला जोरदार धडक दिली होती. ही धडक इतकी भीषण होती की काही मजूर थेट रस्त्यावर फेकले गेले. ट्रकने पुढे असलेल्या टँकरलाही धडक दिली. या अपघातात भारती राजू कांबळे (२५), रेखा त्रिपाठी कांबळे (४०), रूपा बाळकृष्ण माने (३५) आणि कांचन पांडुरंग कांबळे (५२) या चौघी महिलांचा मृत्यू झाला.
याशिवाय सात मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये पार्वती नंदू कांबळे, मंगल लक्ष्मण बेरड, आप्पासाहेब महादेव वाघमारे, वनीता बाबासाहेब माने, मंगल बजरंग आवळे, कबीर शंकर कांबळे आणि श्रेयांश बाळकृष्ण माने यांचा समावेश आहे.
फिर्यादी मोदीनसाब सांबरेकर (वय ३१, रा. बेळगाव, कर्नाटक) यांनी सांगितले की, ते पंढरपूरहून बेळगावकडे द्राक्षे व मजूर घेऊन जात होते. दरम्यान, ट्रकने (एचआर ६७ डी ०३७९) त्यांच्या टेम्पोला (केए २२ एए ४७७०) पाठीमागून जोरात धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी रात्री उशिरा खुशी मोहम्मद अली (२६, रा. हरियाणा) याला अटक केली असून, पुढील तपास उपनिरीक्षक रवींद्र भापकर करत आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर म्हैसाळ गावात हळहळ व्यक्त होत आहे.