

मिरज : मिरज पंचायत समितीच्या नव्या इमारतीच्या सभागृहाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अशा नावाचा फलक भाजपकडून पंचायत समिती प्रशासनाच्या समोर लावण्यात आला होता, तो देखील प्रशासनाने काढला आहे. भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या पंचायत समितीच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावेळी हा फलक लावण्यात आला होता. आता भाजप कार्यकर्ते कोणती भूमिका घेणार? असा सवाल निर्माण झाला आहे.
मिरज पंचायत समितीमध्ये नव्याने बांधलेल्या इमारतीच्या उद्घाटनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादंग सुरू आहे. या इमारतीचे पहिल्यांदा काँग्रेसच्या व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झाले. त्यानंतर ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे व आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीमध्ये देखील उद्घाटन झाले. दुसऱ्या उद्घाटनाचे संयोजन हे भाजप व पंचायत समिती प्रशासनाकडून करण्यात आले होते. या वास्तूचे उद्घाटन झालेल्या दिवशीच येथील सभागृहाला धर्मवीर संभाजी महाराज यांचे नाव देऊन तसा फलक देखील लावण्यात आला होता.
वास्तविक पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेमध्ये या सभागृहाला वसंतदादा पाटील यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. असे असताना देखील प्रशासनाच्या समोरच भाजप नेत्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर येथे "धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृह" असा फलक लावण्यात आला होता. या नव्या इमारतीला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक आंबेडकर चळवळीतील काही कार्यकर्त्यांनी लावला होता. शनिवारी हा फलक काढल्याचे कार्यकर्त्यांना दिसल्यानंतर त्यांनी आंदोलन केले. मात्र रात्री उशिरा पोलिसांसमवेत या आंदोलनकर्त्यांची व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण सायमोते यांच्याशी चर्चा झाली. नव्या वास्तूतील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा फलक देखील काढला असल्याचे सायमोते यांनी यावेळी सांगितले. शासनाच्या निर्णयानुसारच या दोन्ही ठिकाणचे फलक काढले असल्याचे सायमोते यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, काल (रविवारी) आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची मिरजेत बैठक झाली. पंचायत समितीच्या नव्या इमारतीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव लावण्याबाबत आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ते ठाम आहेत. हा फलक शासनाच्या नियमानुसारच लावण्यात आल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. सोमवारपासून मिरज पंचायत समितीच्या आवारात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.