

मिरज ः शहरातील वर्दळीच्या गाढवे चौक परिसरात बुधवारी रात्री भरपावसात धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतला. दुचाकीस्वार प्रसाद पवार यांनी वेळीच दुचाकीवरून बाजूला उडी मारल्याने अनर्थ टळला. या घटनेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
प्रसाद पवार हे आपल्या दुचाकीवरून गाढवे चौकातून टाकळीच्या दिशेने निघाले होते. यावेळी शहरात पाऊस सुरू होता. पावसामुळे शॉर्टसर्किट होऊन दुचाकीतून धूर निघू लागला. क्षणात गाडीने पेट घेतला. गाडीत पेट्रोलचा साठा जास्त असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. दुचाकीने पेट घेतल्याचे लक्षात येताच प्रसाद पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता चालत्या दुचाकीवरून बाजूला उडी मारली. यामुळे ते थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली होती.