

मिरज : मिरजेतील सराईत गुंड एजाज शेख टोळीच्या मुसक्या आवळण्यात महात्मा गांधी चौक पोलिसांना यश आले. टोळीतील पाचजणांना अटक करण्यात आली आहे. टोळीकडून आलिशान कार आणि हत्यार जप्त करण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये टोळी प्रमुख एजाज अल्फाज शेख, बद्रुद्दिन निसार दर्यावर्दी, समीर झाकीर शेख (तिघे रा. अमननगर, मिरज), सौरभ सुनील कोळेकर आणि शंकर गोरखनाथ फुले (दोघे रा. म्हैसाळ रस्ता, मिरज) यांचा समावेश आहे.
सराईत गुंड एजाज शेख याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न व मारामारी इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. त्यामुळे त्याला सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले होते. हद्दपार असतानाही एजाज शेख हा मिरज शहरात वावरत होता. तो त्याच्या टोळीसह मिरज ते कुपवाड रस्त्यावरून जाणार असल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने कुपवाड रस्त्यावर सापळा रचला होता. यावेळी एजाज शेख याची आलिशान कार आल्यानंतर पोलिसांनी टोळीला अटक केली. त्यावेळी कारमध्ये हत्यार मिळून आले. टोळीकडून कोणावर हल्ला करण्यात येणार होता का, याची चौकशी आता पोलिस करीत आहेत.
या कारवाईमध्ये श्रेणी पोलिस उपनिरीक्षक संभाजी गायकवाड, अभिजित धनगर, साक्षी पतंगे, नानासाहेब चंदनशिवे, विनोद चव्हाण, जावेद शेख, अमोल तोडकर, मोसीन टिनमेकर, राजेंद्र हारगे आणि रामकृष्ण सुरवसे यांनी सहभाग घेतला.