

सांगली : मिरज तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केल्याप्रकरणी गजानन काकासाहेब हजारे (रा. लाटवडे, वडगाव, ता. हातकणंगले) याच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताने पीडितेचा विनयभंग केल्याची तक्रारही पोलिसांनी नोंदवली आहे.
संशयित गजानन हजारे आणि नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या एका अल्पवयीन मुलीची काही काळापूर्वी ओळख झाली होती. गुरुवार, दि. 16 रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास गजानन तिला भेटण्यासाठी तिच्या गावी आला होता. एका मंदिराजवळ त्यांची भेट झाली असता, त्याने तिला लग्नाची मागणी घातली. मुलीने आपले वय पूर्ण नसल्याचे आणि जातीचे कारण सांगून नकार दिला. मात्र, संशयिताने तिचे काहीही न ऐकता तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून वडगाव (ता. हातकणंगले) येथे नेले.
मुलगी घरात नसल्याचे लक्षात आल्यावर नातेवाईकांनी तिची शोधाशोध सुरू केली. संशय आल्यानंतर त्यांनी तातडीने लाटवडे गाव गाठून गजाननच्या कुटुंबीयांना जाब विचारला. प्रकरण अंगाशी येईल, या भीतीने गजानन आणि पीडित मुलगी वडगाव पोलिस ठाण्यात हजर झाले. माहिती मिळताच मुलीच्या नातेवाईकांनी तिथे पोहोचून तिला ताब्यात घेतले. पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितल्यानंतर तिच्या आईने सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेतली.
त्यानुसार पोलिसांनी गजानन हजारे याच्याविरोधात अपहरण, विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सांगली ग्रामीण पोलिस तपास करत आहेत.