

ईश्वरपूर : पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर घुणकी (ता. हातकणंगले) जवळ झालेला अपघात आणि याच मार्गावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्र्यांचा ताफा कराडकडे रवाना होणार असल्याने रविवारी सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या मुळे महामार्गावर तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह काही मंत्री कोल्हापूर येथील कार्यक्रम आटपून पुणे-बंगळुर महामार्गावरून कराडच्या दिशेने जाणार होते. त्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.हा व्हीआयपी ताफा निघण्यापूर्वी काही वेळ आधी घुणकी येथील अरुंद पुलावर वाहनांचा अपघात झाला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्याच दरम्यान रात्री आठ वाजण्याच्या सुमारास व्हीआयपी ताफा या मार्गावरून कराडकडे निघाला. ताफ्याच्या सुरक्षेचा भाग म्हणून पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक काही काळ रोखून धरली.
अपघात आणि त्यातच व्हीआयपी गाड्यांचा ताफा यामुळे महामार्गावर महाभयंकर कोंडी झाली. घुणकीपासून ते तांदूळवाडी आणि किणी टोलनाक्यापर्यंत कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक जागेवरच ठप्प झाल्याने प्रवासी व वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रात्री उशिरापर्यंत वाहतूक पूर्ववत करण्याचे काम पोलिस प्रशासनाकडून सुरू होते.