

मिरज : मस्साजोग (जि. बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळून, अन्याय करणार्यांना कडक शासन व्हावे, यासाठी सांगलीतील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याजवळ धरणे आंदोलनाचा निर्णय मिरजेत सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. 23 जानेवारीरोजी होणारा जनआक्रोश मोर्चा रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती मराठा समाजाचे मिरजेतील नेते शरद जाधव यांनी सांगितले.
संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी 23 जानेवारी रोजी जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. परंतु गुन्ह्यातील मुख्य आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई केल्यामुळे तसेच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याचे शासनाने ठरवले आहे, असे प्रथमदर्शनी दिसत असल्याने जनआक्रोश मोर्चा तात्पुरता स्थगित केला आहे. त्याऐवजी 22 तारखेला मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे. मुख्यमंत्र्यांना इतर मागण्यांचे निवेदन देऊन सकल मराठा समाज सांगली जिल्हातर्फे दि. 22 रोजी धरणे आंदोलन होईल. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ मराठा बांधवांनी एकत्रित येऊन धरणे आंदोलन यशस्वी करण्याचे या बैठकीत ठरले.
या बैठकीस माजी मंत्री अजितराव घोरपडे, शरद जाधव, संभाजी पाटील, दिग्विजय पाटील, दिगंबर जाधव, विलास देसाई, अशोक पाटील, नरेंद्र मोहिते, बाळासाहेब नलवडे, अमर पाटील, देवजी साळुंखे, सौ. विजयाताई पाटील, अशोक शिंदे, नामदेव पाटील, प्रशांत जाधव, प्रशांत चव्हाण, सतीश पाटील, किशोर पाटील, संकेत परब, अनिकेत परब आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.