

सांगली : राज्यातील शालार्थ प्रणालीतून वेतन घेणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शिक्षण संचालनालयाने कडक भूमिका घेतली आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे वेतन अदा केले जाणार नाही, असे स्पष्ट आदेश शिक्षण संचालनालयाने जारी केले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, अनुदानित आणि खासगी अनुदानित शाळांमधील हजारो शिक्षक व कर्मचाऱ्यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक झाले आहे.
शालार्थ प्रणालीतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली असून, वेतन वितरणापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे. यापूर्वी शासनाने अनेकदा मुदतवाढ दिली होती. मात्र, तरीही मोठ्या प्रमाणावर ई-केवायसी प्रलंबित असल्याचे आढळल्याने आता थेट वेतन रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे की, वित्त विभागाच्या परिपत्रकांनुसार तसेच २८ जुलै २०२६ रोजी प्रधान सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्देशांची अंमलबजावणी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक तसेच वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकांना सर्व संबंधित शाळांना सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळेच आता शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना तातडीने ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.