

कवठेमहांकाळ : श्री महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल अत्यंत अटीतटीच्या वातावरणात बुधवार, दि. ९ सप्टेंबररोजी स्पष्ट झाला. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नेतृत्वाखालील व अनिता सगरे यांच्या अध्यक्षतेखालील 'महांकाली शेतकरी विकास पॅनेल'ने 'महांकाली साखर कारखाना बचाव कृती समिती'च्या पॅनेलवर मात करत सर्वच्या सर्व १७ जागांवर निर्णायक आघाडी घेतली. त्यामुळे सगरे गटाने 'महांकाली'चा गड कायम राखल्याचे चित्र आहे. रात्री उशिरापर्यंत निकालाची औपचारिक घोषणा झाली नव्हती.
बुधवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतमोजणीच्या प्रत्येक फेरीकडे दोन्ही पॅनेलच्या समर्थकांचे लक्ष लागले होते. सुरुवातीच्या फेरीपासूनच महांकाली शेतकरी विकास पॅनेलने सर्व जागांवर आघाडी घेतली आणि रात्री उशिरापर्यंत ही आघाडी भक्कम राहिली. त्यामुळे सगरे गटाच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.
कारखान्याच्या या निवडणुकीत एकूण १४ हजार ८७२ मतदारांपैकी ८ हजार ५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता; मतदानाची एकूण टक्केवारी ५४.१८ टक्के नोंदवली गेली होती. मतदानानंतर तीन दिवसांनी झालेल्या या मतमोजणीमुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निकालाकडे लागले होते.
महांकाली शेतकरी विकास पॅनेलकडून (सगरे गट) सर्वसाधारण गटातून अनिता विजयकुमार सगरे, दीपक गणपतराव ओलेकर, जीवन वसंतराव भोसले, सुहास शिवाजीराव पाटील, सागर सूर्यकांत पाटील, मोहन निवृत्ती खोत, भीमराव विठ्ठल कोळेकर, प्रकाश पंडित पाटील-बंडगर, संभाजी सर्जेराव पवार, कुमार आप्पासो पाटील, काशिलिंग शामराव कोळेकर, अरविंद सदाशिव स्वामी व दीपक अच्युतराव चव्हाण, महिला गटातून छाया पुंडलिक पाटील व अनुराधा गणपती सगरे, अनुसूचित जाती-जमाती गटातून निखिल संजय बनसोडे, बिगर उत्पादक गटातून शंतनु विजयकुमार सगरे मैदानात होते.
दुसरीकडे विरोधी महांकाली साखर कारखाना बचाव कृती समिती पॅनेलकडून सर्वसाधारण गटातून मिलिंद शिवपुत्र कोरे, बाळासाहेब शंकर खोत, गजानन शिवलिंग कोठावळे, बाबूगोंडा जनगोंडा पाटील, विक्रम लक्ष्मण कोळेकर, संभाजी पांडुरंग पाटोळे, आप्पासाहेब दत्तात्रय कोळेकर, विठ्ठल रामचंद्र माळी-कोरे, बाळासाहेब बजरंग पाटील, राजेंद्र नामदेव पाटील, सूर्यकांत बापू घागरे, जगन्नाथ बिरू कोळेकर, आनंदा राजाराम चौगुले, संग्राम विलासराव भोसले व दिलीप आनंदराव ओलेकर, महिला गटातून कासाबाई आत्माराम बसवर व अश्विनी विक्रम कोळेकर, अनुसूचित जाती-जमाती गटातून अशोक अंकुश चंदनशिवे, बिगर उत्पादक गटातून सरिता रवींद्र गाढवे निवडणूक लढवित होते.
मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत सगरे गटाचे वर्चस्व कायम राहिल्याने कारखान्यावर पुन्हा एकदा सगरे गटाची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले. अधिकृत निकालाची घोषणा रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती. अंतिम निकालाची औपचारिकता बाकी होती.