

सांगली ः पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात लम्पीच्या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. मिरज, कवठेमहांकाळ, वाळवा, जत तालुक्यांतील काही गावांतील जनावरे बाधित झाली आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण करण्यात आले आहे; मात्र उपाययोजनांनंतरही संसर्ग होत आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून लम्पीचा संसर्ग वाढला आहे. गायवर्गीय गाय, बैल, वासराला लम्पीची लागण होते. म्हशींच्या तुलनेत गायवर्गीय प्राण्यात रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने लागण लवकर होते. हा चर्मरोग असला तरी संसर्गाने झपाट्याने पसरतो.
दोन वर्षांपूर्वी आलेल्या लाटेत तब्बल साडेसातशे जनावरे मृत्युमुखी पडली होती. सध्या मिरज, वाळवा, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यांतील अनेक जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. या तालुक्यांतील सर्व जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. मात्र तरीही जनावरांना नव्याने लागण झाली. याचा फटका दूध उत्पादनावरही होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. लम्पी त्वचारोगाच्या लक्षणांमध्ये ताप, डोळे आणि नाकातून स्राव, जास्त लाळ, पशुंच्या शरीरावर फोड येणे आणि दुधाचे उत्पादन कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात.
जिल्ह्यात शंभर टक्के जनावरांचे लसीकरण झाले आहे; मात्र काही तालुक्यात काही जनावरांना बाधा झालेली आहे. बाधित जनावराला चांगल्या जनावरापासून अलगीकरणात ठेवावे. प्राथमिक लक्षणे दिसताच स्थानिक पशुसंवर्धन दवाखान्यात उपचार करून घ्यावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.