Jayant Patil | सहकारात गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव रोखा : आ. जयंत पाटील

जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत फुंकले निवडणुकीचे रणशिंग
Jayant Patil | सहकारात गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव रोखा : आ. जयंत पाटील
Published on
Updated on

​सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संस्थांच्या ठरावासाठी काही गावांमध्ये संचालकांना उचलून नेणे, पळवापळवी करणे व दमदाटी करून ठराव लिहून घेणे दुर्दैवी आहे. सांगली जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात अशी पद्धत यापूर्वी कधीही नव्हती. त्यामुळे सहकारात होऊ घातलेला गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव वेळीच रोखला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी केले.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ९९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. ही सभा बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आमदार पाटील म्हणाले, जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत असून, सहकार विभागाने निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. संस्था प्रतिनिधींच्या ठरावांमध्ये नावे समाविष्ट करण्यासाठी काही ठिकाणी संचालकांची पळवापळवी व दहशतीचे प्रकार घडत आहेत. स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि गुलाबराव पाटील यांनी वाढवलेल्या सहकाराचे पावित्र्य अशा प्रकारांमुळे नष्ट होऊ शकते.

जिल्हा बँकेने आशिया खंडातील सर्वात मोठ्या वसंतदादा कारखान्याला अध्यक्ष विशाल पाटील यांच्या मागणीनुसार २५० कोटींचे कर्ज देऊन पुनरुज्जीवित केले, तर महांकाली कारखाना वाचवण्यासाठीही पराकाष्ठा केली, असे त्यांनी आवर्जून सांगितले. बँकेच्या ठेवी १० हजार कोटींवर पोहोचल्या असून, सांगली जिल्हा बँक ही राज्यातील सर्वोत्तम पाच बँकांमध्ये अग्रस्थानी आहे. या प्रगतीत खासदार विशाल पाटील आणि आमदार डॉ. विश्वजित कदम यांची मोलाची साथ लाभल्याचे त्यांनी नमूद केले.

जयंत पाटील म्हणाले, काही मंडळींनी बँकेवर प्रशासक आणण्याचे आणि चौकशी लावण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांचा हा डाव उघडा पडला असून प्रशासक नियुक्तीचे स्वप्न पाहणाऱ्यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत, असे सांगत त्यांनी नाव न घेता आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडले.

जिल्हा बँकेच्या नोकरभरतीवर बोलताना आमदार पाटील यांनी स्पष्ट केले की, काहींचा कुटिल हेतू हाच होता की बँकेची नोकरभरती कशीतरी बंद पडावी. मात्र, पारदर्शक कारभारामुळे भरतीला मंजुरी मिळाली. राष्ट्रीयीकृत बँकांची भरती घेणाऱ्या ‘आयबीपीएस’ कंपनीमार्फत ४४४ जागांसाठी ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकतेने राबवली जात आहे. १९ हजारांहून अधिक मुलांनी अर्ज करून बँकेच्या कारभारावर विश्वास दाखवला आहे, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news