

सांगली : महाविकास आघाडी आणि मित्र पक्ष जिल्ह्याच्या विकासासाठी यापुढेही एकत्रित काम करू. यापुढील सर्व निवडणुका याच पद्धतीने एकत्रित लढू, अशी माहिती माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास साधू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद सभापती निवडीनिमित्त एकत्रित आलेल्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार राष्ट्रवादी, काँग्रेस व दोन्ही शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार रोहित पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, माजी आ. मानसिंगराव नाईक, माजी आ. विलासराव जगताप, यांच्यासह नेते उपस्थित होते.
आमदार जयंत पाटील म्हणाले की, जिल्ह्याच्या राजकारणात तीस-चाळीस वर्षे कार्यरत असणारी ज्येष्ठ मंडळी आमच्यासोबत एकत्र आली. एकमेकांची मनं, एकमेकांच्या कामाची पद्धत आम्हाला माहिती आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी आमची सदस्य संख्या 34 होती. मात्र या निवडी वेळी कराड मुक्कामापर्यंत आमच्यासोबत असणारे व नंतर आम्हाला सोडून गेलेले विनायक मासाळ पुन्हा आमच्यासोबत आलेले आहेत. याशिवाय शिवसेना ( शिंदे गट) गटनेते जयदीप भोसले व पृथ्वीराज पाटीलही आमच्यासोबत आले आहेत. त्यामुळे सभापती निवडीसाठी आमची एकूण सदस्य संख्या 37 पोहोचलेली आहे.
यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आ. विलासराव जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, मनोज शिंदे, बाबासाहेब मुळीक, महिंद्र लाड, शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील, शिवसेना (शिंदे गटाचे) तानाजी पाटील, जयदीप भोसले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील, उपाध्यक्ष ॠषीकेश लाड आदी उपस्थित होते.