

सांगली : जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी आपल्या कामात हलगर्जीपणा केल्याचा गंभीर आरोप फिर्यादी पक्ष आणि भाजपच्या नेत्या नीता केळकर यांच्यासह काहींनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक कोळेकर यांची अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली असून, या वृत्ताला पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दुजोरा दिला आहे.
संशयित आरोपी नीलेश गडदे याने १० जूनरोजी जत येथे केलेल्या गोळीबारप्रकरणी तक्रार देण्यासाठी फिर्यादी संदीप बंडगर यांचे कुटुंबीय आणि हमाल वर्ग जत पोलिस ठाण्यात गेले होते. मात्र, या अत्यंत संवेदनशील प्रकरणाची जत पोलिसांनी वेळीच गांभीर्याने दखल घेतली नाही. पोलिसांनी वेळीच कडक कायदेशीर पावले उचलली असती, तर ११ जून रोजी अभयनगर येथे १४ वर्षीय वेदांत बंडगर या निष्पाप बालकाची हत्या झाली नसती, असा संताप व्यक्त केला जात आहे.
जत पोलिसांच्या याच ढिसाळ कारभारामुळे आणि हलगर्जीपणामुळे ही मोठी घटना घडल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. या गंभीर तक्रारीची दखल घेत वरिष्ठ पातळीवरून पोलिस निरीक्षक कोळेकर यांची चौकशी सुरू करण्यात आली असून, यामुळे पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.