

ईश्वरपूर : ईश्वरपूर-खेड रस्त्यालगत असलेल्या एका शेतामध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही शेतकऱ्यांना शेताच्या परिसरात बिबट्या फिरताना दिसला. ही माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
संबंधित परिसरात ऊस व इतर दाट पिके असल्याने बिबट्या लपून बसण्याची शक्यता आहे. राजारामबापू कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी शेतकरी बांधव व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शेतात एकट्याने जाणे टाळावे, लहान मुलांना शेत परिसरात पाठवू नये, तसेच रात्रीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. शेतात कामासाठी जाताना गटाने जावे व कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने वन विभागाला माहिती द्यावी, असेही आवाहन केले आहे.