विटा, पुढारी वृत्तसेवा : खानापूर तालुक्यातील रेणावी हद्दीत ऊस आणि इतर पिकात आंतरपीक म्हणून लावलेला जवळपास शंभर किलो गांजा पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. याची किंमत 10 लाख 7 हजार रुपये इतकी आहे. अंदाजे 3 ते 5 फूट उंचीची गांजाची 240 झाडे विटा पोलिसांना आढळून आली. या प्रकरणी संशयित राजाराम आनंदा गुजले (वय 50, रा. रेणावी, ता. खानापूर, जि. सांगली) यास अटक करण्यात आली.
याबाबत विट्याचे पोलिस निरीक्षक शरद मेमाने यांनी सांगितले, रेणावी गावात गांजाची शेती असल्याबाबतची माहिती विटा पोलिस ठाण्याचे हवालदार किरण खाडे आणि उत्तम माळी यांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील आणि आपण पोलिस पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी संशयित राजाराम गुजले याने ऊस आणि इतर पिकांमध्ये गांजाची लागवड केल्याचे आढळून आले.
संशयित गुजले याला ताब्यात घेऊन उसाची आणि शेतीची पाहणी केली. यावेळी उसामध्ये व इतर शेतीमध्ये गांजाची लहान-मोठी 240 झाडे आढळून आली. त्याचे एकूण वजन 100 किलो 700 ग्रॅम असून, सुमारे 10 लाख 7 हजार रुपये किमतीचा हा मुद्देमाल असल्याचे पोलिस निरीक्षक मेमाने यांनी सांगितले. गांजाची झाडे जप्त करून संशयिताला अटक केली आहे. सुमारे अर्धा एकर क्षेत्रावर ही झाडे लावली होती. रेणावी ते वासुंबे या दरम्यान असणार्या पठारावर उसाच्या शेतात ही झाडे लावली होती. या भागात वर्दळ कमी असल्याने कोणाचेही तिकडे लक्ष जात नाही. मात्र आम्हाला टीप मिळाल्यामुळे ही शेती उघडकीस आली, असे पोलिस निरीक्षक मेमाने यांनी सांगितले.
पोलिस निरीक्षक शरद मेमाणे म्हणाले, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशानुसार संशयितावर कारवाई करण्यात येत आहे. अमलीपदार्थ बाळगणे गुन्हा आहे. अमलीपदार्थांबाबत काही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.