

सांगली : सध्या राज्यात आणि देशभरात जाती-जातीत आणि धर्मा-धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात विद्वेष निर्माण केला जात आहे. त्यामुळे जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन जोडीदार निवडण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठी असे जोडीदार शोधणे अत्यंत अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर जाती-जातींमधल्या भिंती तोडण्यासाठीचा कृती कार्यक्रम म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने राज्यस्तरीय आंतरजातीय, आंतरधर्मीय वधू-वर सूचक केंद्र सुरू केले आहे.
या केंद्रामध्ये आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह स्वेच्छेने करणार्या वधू-वरांनी आणि पालकांनी आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन या केंद्राचे राज्य समन्वयक शंकर कणसे आणि डॉ. ज्ञानदेव सरवदे यांनी केले आहे. अंनिसच्या या केंद्रामध्ये वधू-वरांनी किंवा पालकांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना सुयोग्य स्थळ सुचवले जाते. वधू-वराने आपली माहिती पाठवल्यानंतर त्यांनी जोडीदाराची निवड विचारपूर्वक केली आहे ना, याची पडताळणी केली जाते. सत्यशोधकी तसेच विशेष विवाह नोंदणी कायदा याच्याअंतर्गत विवाह करावा, असा सल्ला दिला जातो. नाव नोंदणीची सेवाही विनामूल्य दिली जाते.
आज समाजामध्ये प्रत्येक जातीची वेगवेगळी वधू-वर सूचक केंद्रे आहेत, परंतु जात, धर्म न मानणार्या पालकांना किंवा वधू-वरांना जर आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह स्वेच्छेने करायचा असेल, तर त्यांना असे केंद्र कुठेही नाही. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ही सोय महाराष्ट्रात पहिल्यांदाच उपलब्ध करून दिली आहे.
आंतरजातीय, आंतरधर्मीय तसेच विधवा-विधूर विवाह करू इच्छिणार्यांनी आपली माहिती या केंद्राचे समन्वयक शंकर कणसे (मु. पो. पिंपरी, ता. कोरेगाव, जि. सातारा ) व डॉ. ज्ञानदेव सरवदे, (बारामती) यांना पाठवावी किंवा आपल्या गावातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, नंदिनी जाधव, प्रा. प्रवीण देशमुख, मिलिंद देशमुख, सम्राट हटकर, रामभाऊ डोंगरे, मुक्ता दाभोलकर, डॉ. अशोक कदम, राजीव देशपांडे, प्रकाश घादगिणे, मुंजाजी कांबळे, विनोद वायंगणकर, फारुख गवंडी, अण्णा कडलासकर यांनी केले आहे.