

सांगली : वाहनांना एचएसआरपी (उच्च सुरक्षा नोदणी प्लेट) बसवण्याची मुदत संपून दीड महिना लोटला असलातरी जिल्ह्यातील 5 लाख 59 हजार 297 वाहनापैकी 3 लाख 4 हजार 687 वाहन धारकानीच एचएसआरपी बसवल्या आहेत. याची टक्केवारी केवळ 54.47 टक्केच आहे. जुन्या वाहनांना रिपासिंग शुल्कासह भरमसाठ दंड आकारणीमुळे एचएसआरपी बसविण्याकडे वाहनधारकांचे दुर्लक्ष होत आहे. आता मुदत संपून गेली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाईचा बडगा मात्र अद्याप उगारलेला नाही.
जिल्ह्यामध्ये वाहनांची संख्या 14 लाख 50 हजाराच्या घरात आहे. 1 एप्रिल 2019 नंतरच्या वाहनांना एचएसआरपी बसवण्यात आली आहे. त्यापूर्वीची सांगली जिल्ह्यातील वाहनांची संख्या 5 लाख 59 हजार 297 अशी आहे. 10 फेब्रुवारीअखेर यातील 3 लाख 4 हजार 687 वाहनांना एचएसआरपी (उच्च सुरक्षा नोदणी प्लेट) बसवण्यात आली आहे. अद्याप 2 लाख 54 हजार 610 वाहनांना एचएसआरपी बसवण्यात आलेल्या नाहीत. अद्याप सुमारे 46 टक्के वाहनांना एचएसआरपी बसवण्यात आलेल्या नाहीत. याची मुदत संपून दीड महिना लोटला आहे. मात्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने अद्याप कारवाई सुरु केलेली नाही.
प्रशासनाकडून एचएसआरपी बसवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जुन्या वाहनांना पासिंग करण्यासाठी विविध कर आणि दंड आकारणी केली जाते. यामुळे वाहनधारकांचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे जुनी वाहने एचएसआरपी न बसतातच फिरत आहेत. बहुतांशी वाहनधारक वाहन भंगार (स्क्रॅप) करण्यास तयार आहेत. मात्र यासाठीही पूर्वीचे सर्व कर भरावे लागतात. यामुळे करमाफीसह भंगार करण्यासाठी शासनमान्य केंद्र उभारण्याची मागणी होत आहे.