सांगली : कोयना आणि चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी चांदोली धरणातून एकूण 15 हजार 75 क्युसेक तर कोयना धरणातून 31 हजार 746 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. यामुळे कृष्णा, वारणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये शनिवारपासून अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. धरणाच्या पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी रविवारी सायंकाळ 4 पासून 11 हजार 900 क्युसेक्स विसर्ग वाढवून तो 13 हजार 445 क्युसेक्स व विद्युतगृहातून चालू असणारा 1 हजार 630 क्युसेक असा एकूण 15 हजार 75 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे पाणी पातळीत वाढ होत आहे. पाउस चालू राहिल्यास परिस्थितीनुसार विसर्ग वाढवण्यात येईल, अशी माहिरी पाटबंधारे विभागातून देण्यात आली आहे. त्याचबरोबर कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रविवारी सायंकाळी 5 पासून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 5 फुटांवरून 6 फुट 6 इंचापर्यंत उघडून 29 हजार 646 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
कोयना धरण विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असल्यामुळे त्याद्वारे 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण 31 हजार 746 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.