

शिराळा : शिराळा तालुक्यातील वारणावती येथील शासकीय विश्रामधामची दुरवस्था झाली आहे. गेल्या 40 वर्षांपासून चांदोलीच्या वैभवात भर टाकणारे हे विश्रामधाम शासनाची उदासीनता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अखेरची घटका मोजत आहे.
चांदोली धरणाच्या निर्मितीवेळी अधिकार्यांना धरणाची पाहणी व तपासणी करण्यासाठी चाळीस वर्षांपूर्वी विश्रामधामची उभारणी करण्यात आली. चांदोली धरणाचे बांधकाम सुरू झाले. त्यावेळी राजकीय नेतेमंडळी, शासकीय अधिकार्यांच्या सेवेसाठी सर्व सोयी-सुविधांनीयुक्त विश्रामगृह वारणावती कॉलनीमध्ये बांधण्यात आले. देखभाल-दुरुस्तीसाठी शासकीय कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली. परिसरातील बागेसाठी माळीही कार्यरत ठेवण्यात आले. जेवण बनविण्यासाठी खानसाम्याची नियुक्तीही झाली. विश्रामधामने उत्तम सोयी-सुविधा पुरवल्या. येथील बागबगीचा सौंदर्यात भर टाकत होता. मात्र गेल्या आठ-दहा वर्षांत याचे वैभव संपुष्टात आले.
शासनाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. विश्रामधामसाठी नेमण्यात आलेले खानसामा नाईक व निंबाळकर ही जोडी प्रसिद्ध होती. रुचकर जेवणाची चव घेण्यासाठी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांच्या बैठका वारणावती विश्रामगृहात होत होत्या. आमदार व मंत्री यांचे दौरे नेहमी होत होते. सध्या खानसामा सेवानिवृत्त झाले. तसेच माळी यांच्यासह इतर कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे हे विश्रामधाम सध्या कर्मचार्यांविना ओस पडले आहे. अधिकारी तर केवळ राष्ट्रीय कार्यक्रम असेल तरच कार्यालयाकडे फिरकतात. अनेक भिंतींना तडे गेले आहेत. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. शौचालयाचीही दुरवस्था झाली आहे. पाण्याच्या टाक्यांना गळती लागली आहेत. आठ ते दहा दिवस पाणी येत नसल्यामुळे पाण्याचाही प्रश्न निर्माण होत आहे. परिसरातील विजेचे खांबही गंजले आहेत. विश्रामधामच्या फलकाची दुरवस्था आहे. बाग नामशेष झाली आहे. सध्या केवळ एक चौकीदार कार्यरत आहे. शासकीय दौर्यानिमित्त कोणी मंत्री येणार असतील, तर त्यादिवशी थोडी फार स्वच्छता केली जाते, असे सांगण्यात आले.