

तासगाव : निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारी धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सध्याच्या स्थितीत बळीराजाच्या, सामान्य जनतेच्या बाजूने बोलणारा आवाज क्षीण झाला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा एल्गार माजी खासदार संजय पाटील यांनी केला.
शेतकरी कर्जमाफी या प्रमुख मुद्द्यासह शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी येथे आयोजित चक्का जाम आंदोलनाला प्रतिसाद मिळाला. संजय पाटील म्हणाले, इथं आलेले सर्वजण आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत. या जगात प्रत्येक जण स्वत:साठी जगतोय, त्यासाठी कष्ट करतोय, पण शेतकरी मातीत घाम गाळून स्वतःबरोबरच जगालाही जगवतोय, पण आज या जगाच्या पोशिंद्याचं जगणं अवघड झालं आहे. ऑक्टोबर संपत आला तरी रानातलं पाणी संपेना आणि आमच्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रूही थांबेनात ही वस्तुस्थिती आहे.
ते म्हणाले, कर्जाच्या दुष्टचक्रातून शेतकऱ्याला बाहेर काढायचं असेल तर मायबाप सरकारने कर्जमाफी करणे हाच त्यावरचा एक मात्र उपाय आहे. त्यासाठी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर त्याच्यापुढे एक पाऊल राहून लढायची भूमिका मी आज जाहीर करतो. तुम्ही सगळेजण इथे आलाय ते तुमचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून. हा विश्वास ढळू देणार नाही.
युवा नेते प्रभाकर पाटील म्हणाले, मी स्वतः शेतकरी आहे. माझी द्राक्षाची बाग परवडत नाही म्हणून मी आंब्याची बाग लावली. पण झाले असे की, द्राक्षबाग बरी होती का काय असे आता वाटायला लागले आहे.
ते म्हणाले, इथे बसलेल्याच नव्हे तर 90 टक्के लोकांना परवडत नसली तरी शेती करावीच लागते. पूर्वी उत्तम शेती, दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी म्हटलं जायचं, पण आता उलट झालंय. चार-पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या पोराला सुद्धा पोरगी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण पोरीच्या वडिलाला ही शेतीची अवस्था माहिती आहे.